Saturday, 4 April 2020


करोना आणि मासे

१२ एप्रिलच्या लोकसत्ता बालमैफिलीत प्रकाशीत

(करोनाच्या पार्श्वभूमीवर सागरीजीवनात मारलेला काल्पनीक फेरफटका - हलका फुलका; अंतर्मुख करणारा)

मत्स्यनगरीत पापलेटबाई आजकाल काहीश्या संभ्रमित होत्या. अचानक अलीकडे जरा गर्दी वाढलेली वाटत होती. कालच मि. पापलेट त्रागा करत होते, `` आजकाल चांगले ऐसपैस पोहता येत नाही. पोरांना शिस्तीत पोहता येत नाही; सारखी मधेमधे येतात. अंग कसं आखडून गेल्यासारखं वाटतंय.''
सकाळचा फेरफटका पापलेटबाईंनी सुरमईअळीच्या अंगानी मारला तर तिथे पण नेहमीपेक्षा जास्त गर्दी वाटली. संध्याकाळी पापलेट भाऊंना घरी यायला जरा उशीरच झाला. कारण विचारलं तर म्हणे बोंबील कट्ट्यावर आज बरेचजण भेटले, त्यांच्याशी गप्पागोष्टी करण्यात वेळ गेला. अलीकडे मुलं एकसारखी तोंड वासून खायला मागत नव्हती. स्वतःच कोलंब्या गट्ट करून आपलं पोट भरत होती. हल्ली पाणिही कमी प्रदूषित वाटत होतं.
बराच विचार करूनही काही उमजेना तेव्हा त्यांनी थेट आपल्या भावाशी म्हणजेच हलव्याशी संवाद साधला. हलवाभाऊंनी बहिणीच्या निरीक्षणाला दुजोरा दिला, `` खरंय गं; आमच्याकडे पण अलीकडे गर्दी वाढलेय. शोध घ्यायला पाहिजे.''
रात्री पापलेटबाईंनी पापलेट भाऊंच्या कानावर आपला गोंधळ घातला. नेहमी प्रमाणे त्यांनी दुर्लक्ष केल्याचा आविर्भाव आणला पण थोडे विचारात पडले. बाजूला पोरांच्या कंपूत जरा जास्त खुसखुस वाटल्यामुळे त्यांनीं पोरांना फटकारले.
सकाळपासून पोरं गायब असल्यामुळे पापलेटबाई सचिंत होत्या. पोरांचा शोध घेत फिरता फिरता त्यांना बांगडे वहिनी भेटल्या. त्याही मुलांचाच शोध घेत होत्या. ``हल्ली भारीच द्वाड झालेत मुलं ! काल पण अशीच बराच वेळ गायब होती. कुठे जातात कोण जाणे ,'' बांगडे वहिनी म्हणाल्या. आल्यावर खरपूस समाचार घ्यायला हवा या विचारावर दोघी सहमत होऊन निरोप घेणार तेवढ्यात मुलं उड्या मारत येताना दिसली. एखादं अडवेंचर करून आल्याच्या आनंदात उसळत तरंगत होती. खडसावून विचारल्यावर लांबवर किनार्याच्या दिशेकडे पोहून आल्याचं म्हणाली. पापलेट बाईंनी शेपटीनी पोरांना फटकारलं, ``किती वेळा सांगितलं तिथे जाऊ नका, माणसं पकडतात. तरी नाही ऐकायचं, नसते धंदे करतात,''
``पण काकू हल्ली तिथे कुणीच नसतं आम्ही रोजच जातो,'' इति बांगडे पिल्लावळ.
``हो, तिथे किती मजा आली. मी पाण्याच्या वर जाऊन आलो आणि वरचं निळंशार आकाश पण बघितलं, '' कावळटाच्या या चिवचिवटानी पापलेटबाई अधिकच संभ्रमित झाल्या.    
आता मात्र मत्स्य नगरीत हा एक चर्चेचा व चिंतनाचा विषय झाला. पापलेट भाऊंनी हलवा, सरंगा , बोंबील, बांगडा, घोळ, पाला ई सर्वांची मिटिंग भरवली. पापलेट भाऊंनी विषयाला हात घातला. ``आजकाल बोटी व माणसं कमी दिसतात खरी'' सरंग्यानी दुजोरा दिला. बहिणीशी हा विषय आधीच झाला असल्यामुळे हलवाभाऊ तयारीनिशी आले होते. त्यांनी आधीच खेकडे भाऊंना कामाला लावले होते. आजकाल खेकडेवाडीत माणसं खेकडे पकडायला येत नसल्याची, इतकेच नव्हे तर आजकाल समुद्र  किनारे सुद्धा ओस असतात त्यामुळे खेकड्यांची पोरं समुद्र किनाऱ्यांवर मनसोक्त धुमाकूळ घालू शकतात अशी ग्वाही खेकडे भाऊंनी दिली. माणसं अलीकडे कुणा सूक्ष्म जिवाणूच्या भीतीनं घरीच दडी मारून बसल्याची गोटातली खबर त्यांनी काढली होती. 
हे ऐकताच सर्व मत्स्य आयांचा जीव भांड्यात पडला; `` चला, सध्या तरी मुलांची काळजी नाही, जरा मोकळेपणानी पोहतील तरी.''
तेवढ्यात माश्यांची काही पोर तोंडात नवीनच काही धरून येताना दिसली. खेकड्यानी लगेच ते ओळखलं, ``आजकाल माणसं विषाणूच्या भितीनी तोंडाला हे बांधून फिरतात. समुद्रकिनारी अशी बरीच पडली होती''.
हे ऐकताच सर्वांच्या छातीत धडकी भरली
अरे बापरे ! म्हणजे माणसांमुळे येऊ घातलेलं हे आणखी एक संकट !


कीर्ति कुळकर्णी

०४. ०४. २०२०

Tuesday, 31 July 2018

पुस्तक परीक्षण - काबूल ,कंदाहारकडील कथा


काबूल ,कंदाहारकडील कथा
                   - प्रतिभा रानडे

अफगाणिस्तानातील एकंदरीत राजकीय उलथापालथ व त्यात होरपळणारे नागरीक, विशेषतः स्त्रिया यांविषयी विविध माध्यमांतून ऐकून, वाचून आहोतच. त्यामुळेच    `अफगाणिस्तानातील रहिवाश्यांच्या जीवनातील व्यथा मांडणाऱ्या हृदयस्पर्शी कथा ' असं पुस्तकाच संक्षिप्त वर्णन वाचून पुस्तक विकत घेतलं. खरोखरीच केवळ या सात शब्दांत, नऊ कथा असलेल्या या कथासंग्रहाचा गाभा चपखल  मांडलाय. पार्श्वभूमी अफगाणिस्तान असल्यामुळे स्थानिक व आंतरराष्ट्रीय राजकीय संदर्भ येणारच. ही  पार्श्वभूमी नीट समजण्यासाठी थोडं गुगल करून अफगाणिस्तानच्या राजकीय घडामोडींची अधीक सुस्पष्टता आली ( अर्थात कथा समजण्यासाठी याची आवश्यकता नाही ) ही पण या पुस्तकाची जमेची बाजू.
माणसांची दुःख. भावनीक घालमेल, हुरहूर ही सर्व काळी व स्थळी सारखीच असतात असं आपण मानतो आणि अर्थात बरेचदा ती तशीच असतात पण जेव्हा ही दुःख त्या प्रांताच्या राजकीय उलथापालथी मुळे व त्या अनुषंगाने सामाजिक  शोषण व अत्याचारामुळे वाट्याला येतात तेव्हा या दुःखांची जातच वेगळी असते.
अमेरिकेत शिकलेला व देशाच्या नवनिर्माणासाठी काम करण्याच्या उद्देशाने परत आलेला, बदलाचे वारे वेगळ्याच दिशेनी वाहत असल्याच्या जाणिवेने प्रथम गोंधळला व नंतर हादरलेला व शेवटी राजकीय बदलानंतर स्वतःच्याच देशात परदेशी झालेला, सतत भीतीच्या सावटात जगणारा अन्वर सलीम सर्व स्तरातील लोकांच्या रोजच्या जीवनाचे प्रतिनिधित्व करतो.
उतार वयात नवरा दुसरी बायको आणेल या भितीनी तरुण दिसण्यासाठी ब्युटी पार्लरला आलेली मिसेस रहिमी व योगायोगाने त्याच पार्लर मध्ये आलेली तरुण , सुंदर, शिकलेली व मिसेस राहिमिच्याच नवऱ्याशी मनाविरुद्ध लग्न करायला भाग पडणारी झीनत; कुठलाही गुन्हा नसताना राज्यकर्त्यांनी तुरुंगात डांबून अत्याचार केलेली नुरजाद या तेथील समस्त स्त्रियांच दुःख अधोरेखीत करतात.
मुजाहिदींच्या हल्यात बळी गेलेल्या  हॉकीपटू बलबीर सिंगच्या निमित्ताने आंतराष्ट्रीय राजकारण व त्यापुढे कःपदार्थ ठरणारं वैयक्तिक नुकसान यावर पडणारा प्रकाशझोत अंतर्मुख करतो. लेखिका त्याही पुढे जाऊन कल्पनेच्या आधारे मृत बलबीर सिंगच्या आत्म्याची तडफड, बेवारश्यासारखे एका परकीय जमिनीत गाडलं  गेल्याचा   सल व पडणारे प्रश्न  मांडते व परदेशात  सतत भीतीच्या सावटात राहणाऱ्या सर्वांच्याच मनात खोलवर या शक्यता सतत तरळत असतात हे नमूद करून तेथील दशतवादाची तीव्रता जाणवून  देते .
`लिहायची राहून गेलेली एक कादंबरी ' हि या संग्रहातील एक वेगळी कथा. यात लेखिका कादंबरीसाठीअफगाणिस्तानच्या ऐतिहासिक पार्शवभूमीवर  सुचलेला विषय, त्यासाठी केलेली तयारी, वाचन, अभ्यास, तेथील स्थळांना प्रत्यक्षात दिलेल्या भेटी , त्यातून आकाराला आलेली `शेवटचा माणूस ' ही  कथा यांचे सविस्तर वर्णन करते. यातून लेखिकेची चिकाटी, अभ्यासूवृत्ती, सच्चेपणा दिसतो.
एक वेगळा वाचनानंद देणारा हा कथासंग्रह अतिशय वाचनीय. 

Friday, 26 January 2018

चाफा



Image result for images for all types of son chafa flowers


चाफा सर्व प्रथम भेटला लहानपणी अंगणात. अंगणातच देवचाफ्याचे झाड होते.  पूजेला त्याची फुलं आजी बरोबर तोडण्याचा रोजचा नेम होता.  छान झाडावरच ताज फुल तोडून त्याच्या पाकळ्या उलट्या बाजूला मुडपून देठात अडकवायच्या आणि मग ते फुल अंगठी म्हणून बोटात पकडायचे व अधूनमधून त्याचा सुगंधही घ्यायचा. बालपणीच्या साध्या  निर्भेळ आनंदातला तो एक ! 

कवठी चाफा गौरीच्या पूजेला पाहायला मिळायचा पण हिरवा चाफा मात्र त्यावेळी फक्त माणिक वर्मांच्या गाण्यात ऐकायला मिळायचा. पण एक दिवस अचानक ``लपविलास तू हिरवा चाफा, सुगंध त्याचा लपेल का '' या ओळींचे प्रत्यंतर आले. झाले असे कि, साधारण बारा तेरा वर्षांची असताना बांद्राला मामीच्या माहेरी गेले असता त्यांच्या बंगल्यात घमघमाट सुटला होता. चौकशी करता कळले की पाठीमागच्या प्रचंड मोठ्या व दूरवर पसरलेल्या अंगणात एका कोपऱ्यात हिरव्या चाफ्याचे झाड होते व त्यावर फुललेल्या फुलाचा सुगंध लांब बंगल्यात दरवळत होता. 

चाफ्याच्या सुगंधाची एक गंमत आहे. निदान माझ्या बाबतीत तरी हे होत. गुलाबाच्या फुलांचा वास आला की म्हणतो, ``व्वा गुलाबाचा वास छान आहे '' आणि अलगद तो हुंगतो.  रातराणी आणि मदनबाण तर धुंदच करतात. मोगरा छान फुललाय वास मस्त सुटलाय म्हणतो. पण चाफ्याची तऱ्हा ज़रा न्यारीच ! चाफ्याचा वास आला की प्रथम अनाहुतपणे चमकायलाच होत - अचानक खडबडून भानावर आल्यासारख आणि तोंडातून सहज आनंदोच्चार ओघळतात  - अरे व्वा चाफा ! जणू काही किती अवकाशानंतर भेंट झाली. गंमत म्हणजे प्रत्येक वेळेस  हेच होत.

अगर शायरी ना होती तो





Image result for images related to shayari kalam
अगर शायरी ना होती तो
दर्द ए दिल बया ना होता
हुस्न ए तारीफ़ लब्जों मे ना होती
जिने का बहाना ना होता
प्यार का इज़हार कैसे होता
दर्द बॉंटने का सुकून ना मिलता
महफ़िल के रंग ना जमते
दर्द ए यार दिल छू न जाता
जाम का नशा ना होता
आवाज़ मे दर्द का एहसास ना होता
आपके शायराने अंदाज से हम बेख़बर रहते

Tuesday, 26 December 2017


२४.१२.२०१७


                           

राजस योग , रेशिमबंध
Related imageलगिनघाई, हास्यकल्लोल
वाटें जणू कालचेच सारे

हसत खेत दिवस गेले
बघता बघता वर्ष  सरले

कौतुक, आनंद, प्रेमाची उधळण 
असेच राहो भरजरी सहजिवन
                                                                                               
                                                                                      संसार होवो मोरपंखी सुंदर, आनंद अन सुखांच्या रंगांची उधळण 

                                                                                      प्रथम लग्नवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व अनेक आशीर्वाद
                                                                                      हा व सहजिवनाचा प्रत्येक दिवस आनंदी व अविस्मरणीय करा

Friday, 4 August 2017

The Man Who Planted Trees

Simple and short story, big message

The Man Who Planted Trees by Jean Giono


Read the Marathi translation of the book by Madhuri Purandare.
A very short book ( one can finish in one go ) ; simple narrative account of a chance visitor; very interesting and inspiring story of a native man who alone decided to plant trees on a barren land in Alps and did it single-handedly; dedicated his entire life for the cause. Irony is when during the two World Wars the entire world was on the verge of destruction, this man, Mr Bouffier, was patiently struggling for bringing back life to the region. Simple work but noble cause makes one extra-ordinary.
Credit to the writer who through the fictitious character of Mr. Bouffier tried to give the great message which is relevant even today ( rather shameful its more relevant today )

Friday, 21 July 2017

पालकत्व


नेहमी प्रमाणे मॉर्निंग वॉकला मैत्रीण भेटली; चांगलीच अपसेट आणि काळजीत होती .

झालं असं होतं की आदल्या रात्री तिची मुलीशी चर्चा चालली होती. मुलगी अलीकडेच नोकरीला लागलेय - चांगली नामांकित कंपनी, गलेलठ्ठ पगाराचा आयटी जॉब ! पहिल्या नोकरीचे नवेनवे दिवस त्यामुळे रात्री रोज आल्यावर गप्पा, चर्चा साहजिकच .

``आता तुला माहितेय आपल्यालाही नवीन नवीन नोकरीत नवखे असताना नाही का काही त्रास, मनःस्ताप व्हायचे ? लोक कशी फशी पाडतात. जीव आपला तुटतो म्हणून जरा सल्ला दिला - माणसांच्या दिसण्यावर आणि वरवरच्या बोलण्यावर जायचं नाही; बोलतात एक आणि करतात एक, राजकारण बरच चालतं वगैरे - तर ही एकदम चिडलीच.

मला काही समजत नाही का ? मला  बावळट समजलीस का ? आणि कहर म्हणजे आता या पुढे मी तुला कधीच काही सांगणार नाही म्हणून रागाने तिच्या खोलीत निघून गेली.''

तशी ती काही उठसूट सल्ले देणारी, प्रत्येक गोष्टीत दखल घेणारी, सतत लक्ष्य ठेवणारी आई नव्हती. किंबहुना तिच्याच मुलींच्या व त्यांच्या मित्रपरिवारांच्या शब्दात ती एकदम `कूल मॉम ' , मैत्रिणी सारखीच !

``काळजात असं चर्रर्र झालं सांगू. कसं गं वागायचं या मुलांशी ?''

मैत्रिणीची कळकळ आणि काळजी दोन्ही साहजिकच होतं; विशेषतः नुकत्याच घडलेल्या पार्श्वभूमीवर.

दोनच दिवसांपूर्वी उच्च शिक्षित, सधन, सुजाण, संस्कारी, जबाबदार पालकांच्या तरुण मुलाचा मृत्यू झाला. प्रथमदर्शनी आत्महत्येचा निष्कर्ष काढण्यात आला  ( कदाचित घातपात अथवा अपघात असू शकतो - असल्यास दुर्दैव ) आणि सर्वत्र खळबळ माजली. सामाजिक माध्यमांवर या घटनेची कारणमीमांसा करणारे लेख शेअर केले जाऊ लागले. विशेष भर पालकांकडे मुलांसाठी वेळ नसण्यावर, मुलांच्या एकाकीपणावर. सर्वाला पालकच जबाबदार ! मुलं असमंजस, आततायी, असंयमी, आत्मकेंद्री असली तरी चूक पालकांचीच ! शेवटी मुलंच पालकांचं प्रगतीपुस्तक !  

खरंच आज पालकत्वाची परीक्षा देणं भारीच कठीण झालंय. पूर्ण संभ्रमात टाकणारा आणि कधी कधी तर अगदी सुन्न करणारा प्रश्न ! कारण निकषच कळेनासे झालेत. नक्की काय हवंय आणि कुठे कमी पडलो हेच कळत नाही. अचानक धक्कादायक निकाल समोर येतो - एखादे जिव्हाग्री लागणारे बोल, अबोला, घर सोडून जाणे, काहीच न सांगता घेतलेला घटस्फोटासारखा टोकाचा निर्णय, तर कधी आत्महत्या ! आणि सर्वतोपरी प्रयत्न करूनही काही अनाकलनीय कारणास्तव सुसंवादाच्या पुलाचे बांधकाम कच्चे अथवा अर्धवट होते हे वास्तव स्वीकारण्याची पाळी पालकांवर येते.

आपणच अगदी प्रेमाने वाढवलेलं मुल आपल्याशी मनमोकळं बोलू शकत नाही, तेव्हढे आपण त्याला आपलं वाटत नाही हे विष पचवणे किती कठीण आहे. याही पुढे जाऊन चांगलं खेळतं बोलतं मोकळेपणानी वागणारे मुलं वास्तविकतः मनात काही ठेवून होतं आणि मित्रत्वाने सगळं `शेअर ' करण्याचा बहाणा करत होतं हे तर किती भयंकर हादरवून टाकणारं.

आज घराघरात प्रत्येक सुजाण पालकाची झोप उडाली, प्रत्येकाला आज एकच प्रश्न भेडसावतोय - खरंच आपलं मुल आपल्याला मित्र, जवळचं मानतय का ? आपण कुठे कमी पडतोय का ? आपल्या मुलातही कुठे `मन्मथ ' दडलाय का ?