Saturday, 8 December 2012

भारत 4 इंडिया.कॉम

८.१२.२०१२, मुंबई
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वेब र्जन्यालिझमच्या आजच्या सत्रात भारत4इंडिया.कॉम चे प्रमोटर मंदार फणसे यांची भेट झाली. तेरा वर्षे टि. व्ही पत्रकारीतेच्या विविध अंगांचा अनुभव घेतल्यावर मंदार फणसे यांनी, सॉफ्टवेअर क्षेत्रातील त्यांच्या अनुभवी मित्राच्या जोडीने भारत4इंडिया.कॉम हा आगळा वेगळा संकल्प सोडला.  
भारत4इंडीया.कॉम मागची भुमिका स्पष्ट करताना फणसे म्हणाले की, भारत व इंडीया ही आपल्या देशाची दोन विरुद्ध टोकं असली तरी ती एकमेकांना पुरक आहेत, हा विरोधाभास हेच कटु सत्य आहे तरीही पत्रकारीतेमधे ग्रामिण भागाला कमी प्राधान्य दिलं जातं. ग्रामिण भागातील घडामोडी, तिथे राबवल्या जाणा-या विविध योजना, शेतितील विविध प्रयोग, इ. अनेक गोष्टींना एक व्यासपिठ देऊन त्या सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी भारत4इंडीया.कॉम ची कल्पना आकारास आल्याचं ते म्हणाले. भारत4इंडिया हिच टॅग लाईन असुन `ब्रेकिंगच्या पलीकडे ही आपली भुमिका असेल असेही ते म्हणाले.
गावोगावी स्मार्ट फोन व टॅब्ज् पोहोचले असुन त्या द्वारे विज कपातिच्या काळात लोकं या संकेत स्थळावरचे व्हिडीओ बघतिल असा विश्वास फणसेंना वाटतो. भारत4इंडीया.कॉम च्या उपयुक्ततेच्या दृष्टिने यात ग्रामिण कला, संस्कृती, कृषि विषयक नविन प्रयोग व तंत्रज्ञान यांची माहिती, परदेशी विद्यापिठात शिकण्यासाठी शिष्यवृत्ती मिळवण्या संबंधी मार्गदर्शन इत्यादी गोष्टिंचा अंतर्भाव असेल. पिकपाण्याची माहिती कमॉडिटी बाजारात सुसुत्रता आणेल तर प्रती किलोत दिलेले बाजार भाव शहरी ग्राहकांना दलालांच्या नफेखोरी बाबत जागृत करतील अशी आशा फणसेंना वाटते.
तंत्रज्ञानाच्या दृष्टिने हे संकेतस्थळ प्रगत असुन अमेरीकेतुन अद्यावत तंत्रज्ञान शिकुन आलेली टीम यावर काम करत असून सर्व प्रकारच्या फोन व ब्राउजर्स वर ते पाहता येईल. वेबकास्टिंग हे या संकेत स्थळाचं वैशिष्ठ्य असुन प्रत्यक्ष व संकेतस्थळावर प्रक्षेपण य़ात केवळ ७ सेकंदांची तफावत असल्याचे फणसे य़ांनी सांगितले. प्रसिद्धीपराङमुख राहुन शांतपणे आपल्या क्षेत्रात काम करणारी दिग्गज मंडळी भारत4इंडीया.कॉम साठी ब्लॉग लिहिणार आहेत.
उत्पादनासाठी जाहिरातींवर अवलंबुन न रहाता इव्हेंट्स आयोजित करुन त्या द्वारे हे संकेत स्थळ चालवायला पैसा उभा केला जाईल अशीही माहिती फणसेंनी दिली. सद्धया या संकेत स्थळाची चाचणी चालु असुन लवकरच ते अधिकृतरित्या सर्वांसाठी उपलब्ध केले जाईल.  

Tuesday, 4 December 2012

निमित्त सह्याद्रिच्या चाळिशीचे

२ ऑक्टोबर १९७२ रोजी राष्ट्रपित्याच्या जयंतिचे औचित्य साधून मुंबई दूरदर्शनने पहिला कार्यक्रम सादर केला. आठ मिनीटे उशिराने सुरू झालेला हा कार्यक्रम अनेक अडचणिंवर मात करत पार पडला. तेव्हा पासून गेली ४० वर्षे अनेक व्यत्यय पार करत त्या वेळच्या निर्मात्यांनी अनेक दर्जेदार मनोरंजक व ज्ञानवर्धक कार्यक्रम सादर करून एक पिढी सुसंस्कारीत केली. ४० वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने `लोकमानस मध्ये त्यावेळी मुंबई दूरदर्शनवर शिलेदार व शिल्पकार अशी दुहेरी भुमिका पार पाडलेल्या नामवंत दिग्गज मंडळींच्या मुलाखतिचा कार्यक्रम प्रक्षेपित झाला. डॉ. विश्वास मेहेंदळे, याकुब सईद, विनायक चासकर, अरविंद मर्चंट, अशोक डुंबरे, विजया जोगळेकर-धुमाळे, डॉ. किरण चित्रे, सुधीर गाडगिळ, प्रदीप भिडे, निना राऊत, तसेच पडद्यामागे काम करणारे तंत्रज्ञ डि. एस्. एल्. प्रसाद व के. एल्. सोमनाथ यांच्या गप्पांतून अनेक पूर्वस्मृतिंना उजाळा मिळाला.
आजही गज-याचा सुगंध स्मृतिमधे दरवळतो. `प्रतिभा आणि प्रतिमा द्वारे भेटलेली अनेक उत्तुंग व्यक्तिमत्व, याकुब सईद- बबन प्रभू जोडगोळीचे निखळ विनोद विसरुच शकत नाही. युवादर्शन, शब्दांच्या पलिकडले, अभिरुचिसंपन्न मनोरंजनात्मक मालिका असे अनेक ठसे य़ा मंडळिंनी आपल्या कामाद्वारे उमटवले. दुरदर्शन हे केवळ entertainment चे माध्यम नसुन education, information  entertainment यांचा सुरेख संगम आहे याचे भान ठेवुन हे दृकश्राव्य माध्यम कसे वापरावे याचे पायंडे या मंडळींनी घातले. म्हणुनच ज्ञानदिप, अक्षरधारा, आमची माती आमची माणसं सारखे कार्यक्रमही ग्रामिण तसेच शहरी भागांतही लोकप्रिय होते. अनेक असुविधा, अप्रगत तंत्रज्ञान यांतुन मार्ग काढत, विचारमंथनाला कष्टांची जोड देऊन अनेक रत्ने यांनी भेट दिली व एक पिढी घडवली.
गप्पांच्या ओघात उलगडलेले य़ांच्या व्यक्तिमत्वाचे पैलु त्यांच्या बद्दलचा आदर द्विगुणित करून गेले. `आम्ही दूरदर्शनच्या पडद्यावर आणुन कलाकारांना मोठे केले नाही ते मोठे होतेच त्यांनी दूरदर्शनला मोठे केले हा चासकरांचा विनम्रपणा; `इतर चांगल्या पगाराच्या नोक-या सोडून इथे काम केले कारण इथल काम अधीक समाधान द्यायचं यातुन दिसणार डॉ. चित्रेंच कामावरचं प्रेम; आणि `त्या वेळेला आम्ही इथेच असायचो; घरदार जणु नव्हतच आणि आमच्यात एकमेकांशी स्पर्धा नव्हती तर एकत्र काम करण्याची वृत्ती होती या विजया जोगळेकर धुमाळेंच्या विधानातुन दिसणारी झोकुन देउन काम करण्याची वृत्ती, टिमवर्क व खिलाडुपणा मनाला स्पर्शुन गेले आणि उमगलं त्यांच्या यशाचं रहस्य.
डॉ. मेहेंदळेंचे `या मिडियाला retention value नाही हे विधान फारसे पटले नाही. तसं असतं तर एवढे कार्यक्रम चीरस्मरणात राहीले नसते. आज वानवा आहे तेवढे अभिरुचीसंपन्न कार्यक्रम करणा-यांची ( `नक्षत्रांचे देणे सारखा एखादा अपवाद ).टीआरपी व व्यावसायिक गणितांचं कारण दाखवत सगळं सवंग, दर्जाहीन काम खपवल जातं. विजयाताई म्हणाल्या तसं, `आजही करण्यासारखं खुप आहे इतर वाहिन्यांकडे वळलेला प्रेक्षकवर्ग परत आणणं शक्य आहे; हा सकारात्मक विचार आशा पल्लवित करून गेला.

Saturday, 24 November 2012

लहर

अचानकच अघटीत घडून जात
`का' हा प्रश्न सर्व व्यापुन उरतो
एकमेव उत्तर `नियती' हेच असतं
जर तर च्या विचार गुंत्यात
माणुस आपली अगतिकता अधोरेखित करत रहातो.

***********************************************************************************

बदल

बदल, अशाश्वत जगातील शाश्वत गोष्ट
नव्या पिढीचा जीवनमंत्र, सळसळत्या तारुण्याचा अमृतकुंभ

बदलाव स्वतःला, प्रवाहाशी मिळत जुळत घ्यायला
कधी बदलावा प्रवाह ही, नवी क्षितिज रेखाटायला.

बदला आचार, बदला विचार, आणि सर्व समाज
बदलू नका जीवनमुल्ये आणि आपली नाती.

***********************************************************************************

 माणुस आणि पक्षी

प्रत्येक चिमणीला एक चिमणा आवडतो,
प्रत्येक चिमण्याच्या मनात एक चिमणी भरते.
झटून दोघे घरकुल साकारतात,
भावी आयुष्याचे चित्र रेखाटतात.
पिल्लू दोघांना प्राणप्रिय असतं,
कारण ते दोन श्वासांचा एक श्वास असतं.

पिल्लाला नवीन आकाश दाखवण्यासाठी चिमणा चिमणी झटत रहातात
विस्तारीत क्षितिजा बरोबर दुराव्याचे पदर येतात,
कालची नाती रक्तापेक्षा जास्त जवळची वाटू लागतात.
उबदार घरटयात जीव कोंडतो,
पिलू घरटे सोडून जातो 
चिवचिवणारे घरटे छोटे उदास एकटे खायला उठते

माणसांपेक्षा पक्षी शहाणे.
पिलु उडायला शिकल्यावर आपणहुन घरटे मोडून टाकतात
माया, बंध, पाश यांचा चिरा स्वतःच उखडून टाकतात

संतांप्रमाणे पक्षी शिकवतात मार्ग खरा सुखाचा,
गुंतुनी गुंत्यात सा-या पाय ठेवा मोकळा.

*********************************************************************************** 



Wednesday, 7 November 2012

चवीने खाणार त्याला झिल ओ झेस्ट देणार
खमंग, खुसखुशीत वॉफल कोन, त्यामधे थंडगार आइस्क्रीमचा गोल, त्यावर ड्रायफ्रुट, ठ्रुटिफ्रुटी, चोको चिप्स्ची पखरण आणि त्यावर खोवलेले चॉकलेटचे पिस ! नेहमी कप, कोन अथवा केक व ब्राउनी बरोबर खालले जाणारे आइस्र्कीम जरा वेगळ्या कल्पकतेने आपल्याला सादर केले तर त्याची लज्जत काय वाढते याचा अनुभव घ्यायला एकदा दादर शिवाजी पार्क येथिल `झिल ओ झेस्ट' ला एकदा भेट द्याच.
`सतत बदल व नाविन्य' हाच जीवन मंत्र जपणा-या तरूणाईला आकर्षित करण्यासाठी, वेगळ व नवीन काही देण्याचा प्रयत्न येथे दिसतो आणि हे वेगळेपण देणारे स्वतः तीन तरूणच – शिक्षण पूर्ण केल्यावर नोकरीच्या फंदात न पडता धंद्यात पडणारे ! शेवटी जावे त्याच्या वंशा हेच खरे.
नुसत सादरीकरणात नाविन्य नसून काही हटके चविची आइस्क्रिमही येथे ऋतू प्रमाणे मिळतात. मे महिन्यात येऊन एकदा इथल फणसाचं अथवा ताडगोळ्याच आइस्क्रीम जरूर चाखा.
तरुणाईचा `कूल अँड कॅज्युअल' हा फंडाही इथे अंर्तगत सजावटीत जपलेला आढळतो. लाकडी ओंडक्यावर काच टाकून केलेली छोटी टेबलं आणि भोवताली बसायला छोटे ओंडके व जोडीला ईंग्लिश गाणी म्हणजे अड्डा जमायला एकदम कूल जागा.
आइस्क्रीम पचायला हलकं असल तरी इथल आइस्क्रीम खिशाला थोड जडच. उन्हाळ्यात जस रोज नाक्यावर जाउन कप अथवा कोनचा आस्वाद घेउन जीव शांत करतो तस इथे ऱोजच यायला परवडण जरा कठीणच. पण तरी इथल्या Thank you, bye and see you soon या प्रेमळ आगत्यपूर्ण निरोपाला लवकरच प्रतिसाद दिल्याशिवाय रहात नाही.

Saturday, 29 September 2012

जपानी रहस्य चीरतारूण्याचे
जपान मधे एक म्हण आहे `Your skin is the mirror  of your internal  organs ‘  खरच, जपानी स्त्रियांकडे पाहून हे अगदी तंतोतंत पटत कारण त्या शिडशिडीत, सुडौल म्हणजेच अगदी well maintained  तर असतातच पण याहून मोठं आश्चर्य म्हणजे  त्यांच्या वयाबाबतचे आपले अंदाज हमखास चुकतात. सहसा वाढत्या वयाबरोबर त्वचा निस्तेज, सुरकुतलेली दिसायला लागते पण जपानी स्त्रियांच्या चेह-यावर मात्र वाढत्या वयाचा मागमुस नसतो – एक सुरकुती नाही की डाग नाही. अगदी स्वच्छ, नितळ, तुकतुकीत त्वचा !  या मागे आहेत काही खास जपानी रहस्ये.
`त्वचेचा ओलावा – बाह्य तसेच अंतर्गत – कायम ठेवणं महत्वाचं. मी माझा चेहरा सतत ओलसर ठेवते आणि भरपूर राइस साके (rice sake)  पिते कोयोटो ओकुगावा यांनी त्यांच्या चीरतारूण्याचे रहस्य उलगडले. त्या ४८ वर्षांच्या आहेत यावर विश्वासच  बसत नाही.
साके म्हणजे तांदुळ, पाणि (शक्यतो विहिरीचे) आणि कोजी (एक प्रकारची बुरशी) यां पासून बनवलेले एक पेय. साके आंबवण्याची (fermentation) प्रक्रिया करून बनवत असल्यामुळे यात अल्कोहोल काही प्रमाणात असते. काही देशांत याला राईस वाईन म्हणतात पण साके बनवण्याची प्रक्रीया वाईन व बिअर पेक्षा वेगळी आहे. साकेचे उल्लेख जपान मध्ये ७१२ ए डी पासून सापडतात. साकेचा इतिहास, बनवण्याची विशिष्ठ पद्धत, अनेकविध फायदे, आस्वाद घेण्याच्या पद्धती इ. सगळच मोठं मनोरंजक आहे.
साके आरोग्यासाठी खुप लाभदायक आहेच ( अनेक व्याधींवर साके उपयुक्त असल्याचा दावा आहे ) शिवाय ते ब जीवनसत्वयुक्त असल्यामुळे उत्तम सौंदर्यवर्धकही आहे. ब जीवनसत्व त्वचेचा पोत सुधारून त्वचेची आर्दता राखून ठेवण्याची क्षमता वाढवते. तसेच साकेमधे भरपूर प्रमाणात अमिनो असिड असल्यामुळे ते अंटि एजिंगचेही काम करते. यामुळे त्वचा दीर्घकाळ निरोगी व तरूण दिसते. फार पूर्वीपासून जपानी गेशा साकेचा उपयोग करत आल्या आहेत. मेकअप उतरवल्यावर त्या चेह-याला साके लावत.
`बाहेरून त्वचेला ब जिवनसत्वाचे पोषणही खूपच फायद्याचे ठरते. माझी आजी स्वतःच्या हातांनी कोजी बनवायची आणि तिच्या इतके मऊशार हात मी कुणाचेच पाहिले नाहीत साके कॅफे चालवणा-या ओकुगावा म्हणाल्या. म्हणूनच आज जपान मधे साके बुरो म्हणजेच साकेची आंघोळ खुपच लोकप्रिय आहे. त्यासाठी खास प्रकारची साके मिळते. तसेच मसाज करायला भाताची तुसं भरलेल्या कापडी थैल्याही मिळतात. षोडश वर्षिय बालेसारखी सुंदर त्वचा असलेली चाळिशीची नेमोटो युको रोज असा मसाज करते.
वाकामे (wakame) हे जपानी सौंदर्याचे आणखी एक रहस्य. माशांच्या जोडीला जपानी लोक त्यांच्या  सॅलड अथवा सुपामधे या सामुद्री वनस्पतीचा (sea weed) भरपूर प्रमाणात वापर करतात. यामुळे त्वचेचे U V Rays पासून रक्षण होते व त्वचा सुरकुतण्याच्या प्रक्रियेलाही आळा बसतो. तसेच यातील hyaluronic  असिडमुळे त्वचेची लवचिकता वाढून त्वचा दीर्घकाळ तरूण दिसते. ब-याच जपानी सौंदर्य प्रसाधनांमधे याचा वापर करतात.
जपानचा सुप्रसिद्ध ग्रीन टी सुद्धा सौंदर्य अबाधीत राखायला हातभार लावतो. यातील विशिष्ठ प्रकारचे अमिनो असिड शरीरातील तणाव वाढवणा-या संप्रेरकांना (harmones) नियंत्रणात ठेवून कोलोजिन फायबर्स सुस्थितीत ठेवते. यामुळेही त्वचा घट्ट, तुकतुकीत व तरूण दिसते. म्हणुनच आजकाल ग्रीन टीचे चेह-याला लावायचे लेपही बरेच लोकप्रिय होत आहेत.
एकंदरीतच जपानी लोक तारूण्य टिकवायला नैसर्गिक अन्नघटकांवरच भर देतात. आपणही आपल्या आहारात पालेभाज्या, कडधान्ये, लसूण, चिकन, दुग्धजन्य पदार्थ इत्यादींचा भरपूर प्रमाणात वापर करून वाढत्या वयाला आळा घालूया.